अमरावती-अचलपूर दंगलप्रकरणी आमदार रवी राणा यांनी केलेले शांततेचे आवाहन त्यांचे नर्काश्रू आहे. जातीयवादी भाजपच्या 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये असणाऱ्या आमदारांना शांततेचे आवाहन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. कारण त्यांच्या अर्धांग भाजपानेच अचलपूरची दंगल घडवून आणलेली आहे, असा आरोप करीत आ. रवी राणांचे शांततेचे आवाहन चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका प्रदेश काँग्रेस प्रवक्ते ॲड दिलीप एडतकर यांनी केली आहे.
पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर या अपयशी झाल्या असून त्यांच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे चालतात, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आमदार रवी राणा यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांची नावे पत्ते तीन दिवसात पुराव्यानिशी दिली तर जिल्हा पोलीस अधीक्षक व अमरावतीप पोलीस आयुक्त निश्चित कारवाई करतील; परंतु त्याची सुरुवात बडनेरा मतदारसंघापासून करावी, असे आव्हान ॲड. दिलीप एडतकर यांनी राणा यांना दिले आहे.
तीन दिवसात राणांनी किमान बडनेरातील अवैध धंदेवाल्यांची नावे द्यावीत, अन्यथा यशोमतीताई ठाकूर यांची माफी मागावी, असेही ॲड. दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे. टक्केवारीवर पक्ष व कार्यकर्ते पोसणार्या आमदार रवी राणा यांनी विकास कामावर लक्ष देण्याऐवजी मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणासाठी भोंगे वाटणे सुरू केले आहे. आता त्यांनी भाजपसोबत असलेले "लिव इन रिलेशन" संपवून थेट लग्नच करावे, असा सल्लाही दिलीप एडतकर यांनी यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यात एकदा तरी दंगल घडवून आणायची, असा चंग बांधलेल्या भाजपा व राणा दांपत्याने १२ नोव्हेंबर पासूनच शहरात अशांतता घडवून आणण्याचे प्रयोग सुरू केले आहेत. त्यात शिवरायांनाही या मंडळींनी ओलीस धरले होते; येण केण प्रकारेण शहरातील व जिल्ह्यातील जातीय सलोखा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भाजपा व भाजपा प्रायोजित राणा दाम्पत्य करीत आहे, असा आरोप करून प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी या जातीय टोळक्याला रोखण्याचे आवाहन पोलीस विभागाला केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात कुठेही दंगली झाल्या नाहीत, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. काही अंशी तो खरा आहे; परंतु त्याचे कारण तेव्हा दंगलखोरच मंत्रिमंडळात होते त्यामुळे तेव्हा दंगली झाल्या नाहीत, परंतु आता दंगलखोर सत्तेबाहेर फेकल्या गेल्यामुळे सत्तेविना प्राण तळमलेल्या दंगलखोरांनी करामती करणे सुरू केले आहे. लॉकडाऊनमधून नुकताच मोकळा श्वास घेतलेल्या सर्वसामान्यांना आता दंगलीच्या फुफाटात ढकलून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून सत्ताप्राप्तीचे प्रयत्न म्हणजे सध्याच्या प्रायोजित दंगली होत, असे काँग्रेस प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
दुकानदारी बंद म्हणून राणा अस्वस्थ
आमदार यशोमती ठाकूर यांच्यामुळे रवी राणा यांची राजकीय ठाकूरकी तर पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यामुळे अवैध धंद्यांची दुकानदारी संपुष्टात आलेली आहे. गुन्हे प्रकटीकरणात अमरावती आयुक्तालय राज्यात पहिला क्रमांकावर असताना पोलिसांचा धाक नाही, असे म्हणत रवी राणा यांनी दोन यशस्वीनिंवर रोष व्यक्त केलेला आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्या राजकारणाला खिंडार पाडले असून आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी बडनेरा मतदारसंघातील अवैध धंदे बंद केले. त्यामुळे रांणांचा अर्धा स्वाभिमान गर्भगळीत झाला. म्हणून राणांचा थयथयाट असल्याचे प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले.
0 Comments